छत्रपती ताराराणीसाहेब यांना आज स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा
९ डिसेंबर महाराणी ताराराणी यांचा स्मृतिदिन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशहा औरंगजेब महाराष्ट्रात आला. तो २७ वर्षे येथेच राहिला.छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणींनी औरंगजेबाशी सात वर्षे शौर्यशाली लढत दिली. शूर सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या सुनबाई व छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई या अत्यंत तेजस्वी व तडफदार होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर वैधव्याचे दुःख गिळून मराठी राज्यासाठी घोड्यावर स्वार होऊन त्यांनी पदर खोचला, हाती तलवार घेऊन औरंगजेबाचे लष्करी आव्हान स्वीकारले. इतिहासातील या असामान्य स्त्री बद्दल सर्व मराठी जनतेला अभिमान व स्फूर्ती वाटायला हवी . ताराराणींचे संपूर्ण आयुष्य सुखदुःखाने भरलेले व मराठी मनाला मोहविणारे होते. हिंदुस्थानभर सत्ता असणाऱ्या बादशहा औरंगजेबाशी त्यांनी समर्थपणे दिलेला लढा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. जगातील सर्वश्रेष्ठ लढव्वयी,झुंजार व कर्तबगार स्त्री म्हणून ताराराणींची ओळख आहे .
ज्या औरंगजेबाची मान कधीच झुकली नाही ,त्या दिल्लीच्या तख्ताला ताराराणी यांनी नाकी नऊ आणले. एक स्त्री असूनदेखील छत्रपतीच्या विचाराला ,स्वराज्याला जपले , वाढवले पण त्या कुणाही पुढे झुकल्या नाहीत. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यू नंतर ताराराणी यांनी मराठी राज्याची सर्व जबाबदारी आपल्यावरंच आहे, हे ओळखून त्यांनी राज्यकारभाराची सर्व सूत्रे लगेचच आपल्या हाती घेतली.स्वराज्यात मोगलांशी लढत असताना सर्व मराठ्यांना आपल्या धाकात ठेवून त्यांना स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली.मराठ्यांच्या अंगी असणाऱ्या शौर्य ,पराक्रमादी गुणांना त्यांनी उत्तेजन व वाव दिला.मराठ्यांना मोगल मुलखात धाडून तेथे धामधूम माजवून .दिल्लीतील मोगलांची राज्यकारभार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दिल्लीकराचे नीतिधैर्य खचले.याउलट मराठी राज्यकर्त्यांचे व लष्कराचे नीतिधैर्य वाढले होते.ताराराणींनी औरंगजेबासारख्या हिकमती व बलशाली सम्राटाशी सामना देण्यात अपूर्व शौर्य दाखविले .औरंगजेबाबरोबर सतत लढा देऊन किंवा गनिमीकाव्याने युध्द करुन त्यांना जीव नकोसा करून सोडला होता.दिल्लीच्या मोगलांना खडे चारून ताराराणी यांनी मराठी सत्तेचे संरक्षण केले .ताराराणींनी मोठे अवघड व जिकिरीचे काम केले. म्हणूनच महाराष्ट्रात औरंगजेबाला पाय रोवता आले नाहीत. पुढे मोगलांना मराठी मुलखात सत्ता वाढवता आली नाही. ताराराणी फारच कर्तृत्ववान, करारी , कडवी ,राज्यकारभार करण्यास अतिशय समर्थ अशा होत्या. म्हणूनच मोगलांना अनेक वेळा त्यांनी अडचणीत आणले.ताराराणी यांनी मोगलांपासून स्वराज्याचे रक्षण केले.अवघ्या पंचवीस वर्षांच्या एका विधवा स्त्रीने औरंगजेबासारख्या सम्राटाला जेरीस आणले , ही आपल्या इतिहासातील एक असामान्य घटना, सर्व मराठी लोकांना अभिमानाची व स्फूर्तीदायक वाटायला हवी.ज्या महाराष्ट्राला संपवून सर्वत्र मोगलांचे राज्य करण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत धावून आला होता.तब्बल सत्तावीस वर्षे औरंगजेब महाराष्ट्रात राहिला,त्यास एकही निर्णायक विजय मराठ्यांनी मिळू दिला नाही. ताराराणी सारख्या शूर राणीची आज स्मृतिदिनानिमित्त आठवण झाल्याशिवाय रहात नाही. ” कवी कविंद्र यांनी लिहीले आहे.
“दिल्ली झाली दीनवाणी l
दिल्लीशाचे गेले पाणी ll
ताराबाई रामराणी l
भद्रकाली कोपली ll
रामराणी भद्रकाली l
रणरंगी क्रुध्द झाली ll
प्रलयाची वेळ आली l
मुगलहो सांभाळा ll
छत्रपती ताराराणीसाहेब यांना आज स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा